पुणे : ‘सॉफ्टवेअर उत्पादनांचा जागतिक बाजार ५०० बिलियन डॉलरचा असून, त्यातील भारताचा वाटा जवळपास आठ बिलियन डॉलर्सचा आहे. येत्या २०२५ पर्यंत तो ७० ते ८० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी सरकार, विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून एकत्र येऊन पोषक वातावरण तयार करण्याच प्रयत्न होत आहे,’ असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या ‘एसटीपीआय’ (सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया) विभागाचे महासंचालक डॉ. ओंकार राय यांनी केले.
सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात ‘सीप’तर्फे आयोजित आठव्या ‘पुणे कनेक्ट’ परिषदेत ते बोलत होते.
‘सीप’च्या कार्यकारी समितीचे सदस्य व पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे, ‘सीप’चे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, ‘पुणे कनेक्ट’चे कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे या वेळी उपस्थित होते.
राय म्हणाले, ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया अंतर्गत देशात २८ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारली जात असून, त्याद्वारे माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा मेंटॉर म्हणून एक समुह तयार केला जात आहे. या २८ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय, एसटीपीआय व इतर सरकारी विभागांकडून ६०० कोटींहून अधिक रुपयांची मदत देण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉक चेन अशा विविध विषयांसाठी ही केंद्रे काम करतील. विशेष म्हणजे यातील प्रत्येक केंद्राचे प्रमुख या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील.’
‘गेल्या दोन दशकांत भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला असून, इतर व्यावसायिक क्षेत्रांवरही या क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. आता भारतात बऱ्याच प्रमाणावर संशोधन व निर्मितीचे (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) आऊटसोर्सिंग होते. सरकारच्या धोरणांमध्ये या सगळ्याची दखल घेतली जात आहे,’ असेही राय यांनी सांगितले.
या वेळी तंत्रज्ञानातील सल्लागार जसप्रीत बिंद्रा यांच्या ‘द टेक व्हिस्परर’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड’ ही या वर्षीच्या ‘पुणे कनेक्ट’ची मध्यवर्ती संकल्पना होती. माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेक तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचा कार्यक्रमात समावेश होता. सिस्कोचे भारत व सार्क देशांमधील अध्यक्ष समीर गद्रे यांच्या व्याख्यानासह अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि पुन्हा धीराने उभ्या राहिलेल्या अनमोल रॉड्रिग्स यांच्याशी गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजनही या वेळी करण्यात आले होते.